आजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

ऐलमा पैलमा - . . . - Happy Birthday to you

नवरात्र आणि ऑक्टोबर महिना म्हटल्यावर मला सगळ्यात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे भोंडला ! 

बरीच म्हणजे साधारण मी लहान असताना ५ - ६ वर्ष सलग आम्ही घरी भोंडला केला मग मी मोठी झाले शाळेच्या परीक्षादेखील ह्याच सुमारास यायच्या आणि मग ही एक सुंदर प्रथा आमच्या घरापुरती बंद पडली.
माझा वाढदिवस बऱ्याचदा नवरात्रीत येत असे आणि लहानपणी पाश्चात्य पध्धतीने वाढदिवस साजरे केलेले मला आवडत नसत मग भोंडल्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरा व्हायचा आणि वेगळीच मज्जा यायची.
आदल्या आठवड्यात hall मध्ये सामानाची rearrangement करून भोंडल्याचा फेर धरता येईल इतकी जागा आम्ही करून ठेवायचो.

सोसायटीमधल्या सगळ्या तायांना संध्याकाळी यायचं आमंत्रण आईने दिलेलं असे. ( माझ्या वयाचं किंवा लहान तेव्हा कोणीच नव्हतं! ) सकाळीच आजी घरी यायची आणि काहीतरी माझ्या आवडीचा पदार्थ खिरापत म्हणून करून ठेवायची.

माझ्याकडे एक खेळण्यातला लाकडी हत्तीचा पुठ्ठा होता. मग त्या हत्तीला एका पाटावर ठेवून त्याभोवती एखादी ताई खडूने छोटीशी रांगोळी काढत असे. सगळे त्यांच्या आयांसकट जमले की आमचा भोंडला सुरु व्हायचा. सुरुवात अर्थातच ' ऐलमा पैलमा गणेश देवा… ' म्हणून होत असे आणि मग एक - एक गाणी म्हटली जात. आजीला बरीच गाणी पाठ होती त्यामुळे ती म्हणताना -  त्यातले विनोद , उपहास आणि मुलींच्या सासरच्या मंडळींवरच्या गंभीर टिप्पण्या समजून घेताना त्या वयात मज्जा यायची -काळ किती बदललाय हे जाणवायचे.

सगळे दमले की मग सगळ्यात महत्त्वाचा खिरापत ओळखण्याचा खेळ सुरु व्हायचा. मग अगदी चव - वास - रंग - रूप सगळे प्रश्न स्वयंपाकघरात विचारले जायचे. आई - आजी आम्हाला ओळखता येणार नाही अश्या पद्धतीची उत्तरं देत खिंड लढवायच्या. कधीतरी जी व्यक्ती ती खिरापतआणायची ती भलतेच प्रश्न विचारून / उत्तरे देऊन दिशा बदलायचा प्रयत्न करत असे. आणि सगळ्या खिरापती ओळखल्याशिवाय वाढदिवसाचा केक कोणालाच मिळत नसे त्यामुळे सगळी मजा खिरापत ओळखण्यात ! डोकं चालवायला कसली मज्जा यायची तेव्हा

पुढे एक वर्ष काहीतरी झालं म्हणून जमलं नाही आणि मग पुन्हा कधी तसं काही झालं नाही. आता बरीचशी गाणीसुद्धा विसरले आहे कधीतरी लिहून काढायला हवीत आणि online साठवायला हवीत.

वाढदिवस असेच येत गेले पुढेही येतील. उगाचच यंदाही नवरात्र सुरु असल्यामुळे ह्या जुन्या आठवणींची नोंद करून ठेवावीशी वाटली :)

अगदी लहान असताना आजी औक्षण वगरे करत असे नंतर वाढदिवस हे केवळ पेस्ट्रीज खाण्यापुरते उरले. शाळेत आम्ही coffee bite वाटायचो .  इथे IISc मध्ये आले तेव्हा आम्ही आमच्यातला पहिला वाढदिवस अगदी केक आणून  साजरा केला त्यामुळे माझे मित्र - मैत्रिणीसुद्धा माझ्या वाढदिवसाला तेच करत.तीच पद्धत पडली जणू ! पहिल्या वर्षी ठीक होतं पण नंतर लक्षात आलं formality म्हणून मित्र - मैत्रिणी येतात. ( असं आम्ही इतरांच्या वाढदिवसाला observe केलं म्हणून लक्षात आलं ! )
बऱ्याचदा माझे  खास असे दोस्त नसल्यामुळे माझा वाढदिवस गेली दोन वर्ष विसरताहेत :) . साजरा करू नका असं थेट सांगताही येत नाही अन् खोटं सतत हसता येत नाही ( म्हणून इथे नोंद करून ठेवत्ये ! )
इथून पुढे कदाचितपद्धत बदलेल किंवा साजरेपण संपेल पाहूया :)

' जे जे होईल ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान ।' हेच खरं !


१८ ऑक्टोबर २०१५
( सुज्ञास सांगणे न लागे ;p )

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

दीपावली : एक मुक्त चिंतन

शुभ दीपावली आणि नववर्षाच्या शुभेच्छा !

असाच थोडा विचार करत बसले होते अन् विचारांची मुक्त उधळण सुरु झाली मनात . थोडीशी विस्कळीत थोडीशी आठवणीनी ओथंबलेली . आणि मग उतरवली अनुदिनीवरल्या ह्या कागदावर … 

दिवाळी दिवाळी म्हणजे नेमकं काय ?

सध्यापुरता विचार केला तर गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून माझ्यासाठी हा एक सुटी असलेला दिवस ह्याशिवाय तरी काही वेगळे महत्व नाही या दिवसाचं !

आजोबा असताना मी शाळेत असल्यामुळे मोठी सुटी मिळे आणि पूर्ण दोन आठवडे ठाण्याला जाऊन राहता येई .आजी आणि दोन्ही दादांबरोबर रांगोळी काढणे,  किल्ले बघायला जाणे अन भर दुपारी उन्हात मनसोक्त खेळणे असे ते सुंदर दिवस होते . याहीपेक्षा आजोबांसोबत दिवाळीच्या सुटीतला अभ्यास करायला मिळायचा. खूप मजा यायची या सुटीच्या दिवसांत . कितीतरी नवीन पद्धती , गणितातील गमती - जमती , लिखाणाचा सराव , मुद्रितशोधानात त्यांना केलेली मदत अन् दिवाळीच्या वहीसाठी लढवलेली कल्पकता हीच खरी  दिवाळी असायची माझ्यासाठी.केवढा शिकायला मिळलय तेव्हा आजोबांकडून ! दिवाळीची वही सजवताना , अगदी एक साधा कागद वहीत कमीत कमी गोंद वापरून कसा नीट चिकटवायचा इथपासून ते अगदी डोळ्यासमोर उभे राहील असे प्रवासवर्णन सोप्या शब्दात कसे लिहायचे किवा पत्र कसे लिहायचे हे सारे नकळत शिकायला मिळाले आजोबांकडून ह्या जेमतेम ५-६ दिवाळीच्या सुट्यांमध्ये . अशाच बहुदा त्यांच्या शेवटच्या दिवाळीत आयडियलकडे मागवून घेतलेली अन मला काही पूर्वकल्पना न देता माधुरी पुरंदरे ह्यांची "वाचू आनंदे " हे पुस्तकांची मालिका  वाढदिवस आणि दिवाळी भेट म्हणून त्यांनी घेतली होती . ती आजवरची मला मिळालेली सगळ्यात मौल्यवान अन खूप काही शिकवुन गेलेली अशी विशेष दिवाळी भेट ठरली. 
नावापुरते आणि आमची हौस भागवायला २-४ अनार ,  एखादे भुईचक्र आणि फुलबाज्यांचा एक खोका हे आणि एव्हढेच फटाके घाबरत घाबरत आई - बाबा , आजी - आजोबा,  मावशी - काका आणि दोन्ही दादांसोबत अंगणात फोडायचो . कसं कोण जाणे पण फटक्यांमुळे प्रदूषण होते इ  गोष्टी मला त्या लहान वयातही समजत होत्या . केपा आणि त्यांच्या बंदुका घेऊन मात्र आम्ही बरेच दिवस वेगवेगळे चोर शिपाई आणि इतर मारामारीचे खेळ वाडाभर उंडारत खेळत असू . आजोबा गेले अन् त्यावर्षी फटाके आणण्याचे थांबवले ते थांबवलेच . नंतरही कधीतरी आईने एकदोन फुलबाज्या आणल्या होत्या ; पण ती मजा नसल्यामुळे इच्छाच झाली नाही फटके फोडायची . पणत्या आणून त्या रंगवणे हाही एक उपक्रम मात्र नंतर बरेच वर्ष मी केल्याचं मला चांगलंच आठवतंय . 

आजोबा गेल्यावरही आजीसोबत ह्यातल्या बऱ्याच गोष्टी दर दिवाळीच्या सुटीत होत असत पण ती मजा पुन्हा कधीच आली नाही . नंतर नंतर अभ्यास वाढत गेला अन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यात ही सुटी संपू लागली पण त्यात एक वेगळी मजा  होती ज्ञान मिळवण्याची अन यश संपादन करण्याची .
पण ह्या साऱ्यात एक अत्यंत समान धागा होता ज्यात माझा बराचसा वेळ व्यतीत होई  तो म्हणजे "दिवाळी अंक " किमान दहा अंकांचे वाचन झाल्याशिवाय समाधानच होत नसे. मग ते अगदी चंपक किशोर पासून ते मोठ्यांच्या मासिकातील त्या वयात वाचण्याजोग्या कथा अन मुलाखती असोत . पुढे पुढे गाडी चांदोबा वगैरेंवरून एकदम पत्रिका , छात्र प्रबोधन यांवर येउन थांबली. पण ह्या अंकांनी जणू व्यक्तिमत्व घडणीत फार मोठा मोलाचा वाटा  उचलला . समाज म्हणजे काय ह्याचे भान हळूहळू ह्यातून येत गेले. माणसांच्या चित्रविचित्र स्वभावाचे निदान theoretically ज्ञान होत गेले .दिवाळी अंकांची चाहूल मला पार कोजागिरी पासून लागत असे. कोणताही अंक माझ्याशिवाय कोणी उघडायचा नाही ह्या एका कारणावरूनच काय तो हट्ट - चिडचिड आणि रडणं होत असे. दिवाळी म्हणजे दिवाळी अंक हे जवळ जवळ bijective Function जणू ! 

हळू हळू मोठी होत गेले तसा आता वर्षभर खात असलेल्या चिवडा - लाडू चकलीचे दिवाळीपुरते पूर्वी असलेले महत्व कमी झाल्याने, घरातल्या अनेक मधुमेहींमुळे एकूणच गोड मिठाई आणि इतर पदार्थ खाण्यातला कमी झालेला उत्साह , वर्षानुवर्षे पाहिलेली दादरची खरेदीची गर्दी आणि आधीच गरज भागेल इतके असलेले कपडे ह्यांमुळे नवीन कपडे वगरे बद्दल असलेली अनास्था , कुटुंबीयांनी एकत्रित भेटण्यासाठी नसलेला वेळ आणि मुंबईत होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे होणारी चिडचिड … एकूणच ह्या अनेक घटकांमुळेच दीपावली साजरी करण्यात फोलपणा आहे असेच काहीसे वाटू लागले . घरी तसेही कोणत्याच सणाचे प्रस्थ - पूजा - अर्चांचे अवडंबर नव्हतेच . कदाचित त्यामुळेच मी मनातून ह्या  दिखाऊ साजऱ्या उत्सवापासून कायमच दूर दूर जात राहिले .

गेली तीन वर्षे मात्र इथे वेगळ्याच विश्वात असल्याने दिवाळीचातसा विशेष गंधही नाहीये. नवीन कपडे घालणे अन केवळ आपली संस्कृती , पूजा - अर्चा … अशा दृष्टीकोनातून मी कोणत्याच सणाकडे अन विशेषत: दिवाळीकडे आजतागायत पहिले नसल्यामुळेच  असेल कदाचित पण राहिलेला अभ्यास संपवण्यासाठी मिळालेली एक बोनस सुटी अशी माझी मानसिकता झालीये . फारतर आंतरजालावर प्रसिद्ध होणारऱ्या दिवाळी अंकाचे वाचन एवढाच माझा काय तो दिवाळीशी संबंध . 
आम्ही सगळीच भावंडं वेगवेगळ्या शहरांत आणि आपापल्या कामात व्यग्र आहोत . आणि . . आता आजीही नाही :( आम्हाला सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा हा महत्वाचा दुवाच निखळलाय. यंदापासून तिची दरवर्षी होणारी भाऊबीजही आता ह्यापुढे नसेल . माझी दृष्ट काढायला ते सुरकुतलेले मऊ हात नसतील अन् मुख्य म्हणजे मी पुढच्या सुटीत घरी जाईपर्यंत माझ्यासाठी खुणा करून ठेवलेल्या दिवाळी अंकातले लेख नसतील . छात्र प्रबोधनच्या अंकाला कुणीच स्पर्श केलेला नसेल . आई - बाबा देखील बहुदा कार्यालयातून मिळालेली ही सुटी इतर कामे करण्यासाठीच वापरत असतील.

खरंतर सगळी मजाच जणू निघून गेलीये आता दिवाळीतली. इथे सगळ्या मैत्रिणी sweets , new dresses , पूजा , lamps अश्या चर्चा करत असताना त्यात सहभागी व्हायची अजिबात इच्छा नाहीये . त्यात एकाच समाधान म्हणजे आज एक नवीन दिवाळी अंक वाचायला मिळाला . अक्षरश : झपाट्याने वाचून काढला अन् वाटले हीच माझी यंदाची दीपावली . 


गेले ते दिन गेले म्हणत त्या जुन्या आठवणीत रमायचे अन् पुढील अभ्यासासाठी सज्ज व्हायचे यासाठी घेतलेला एक थांबाच जणू …

- Sam

ऑक्टोबर २३ , २०१४
लक्ष्मीपूजन

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

ती गेली तेव्हा …

एक वेगळेच रसायन होते ते ! आजोबांना सतत काम करता यावे म्हणून घराची जबाबदारी  समर्थपणे उचलणारी , मला बरं नसेल तर सारे काम सोडून ठाण्याहून  वरळीला धावत येणारी , रोज छोट्या शाळेत न्यायला येणारी अन् माझे खाण्यापिण्याचे अगणित चोचले पुरवणारी , शेवटच्या काही वर्षांत कायम घरी असल्यामुळे घराला खरं खुरं घरपण आणणारी अशी….  ती "माझी आजी !'

आता रात्री उशिरा घरी गेल्यावर खास माझी वाट बघत जागं असलेलं आपलं माणूस नसेल… 
वेळी - अवेळी भूक लागली तरी प्रेमाने काहीतरी खायला करून देईल असं हक्काचं कोणी नसेल…. 
वेगवेगळ्या वर्तमानपत्रातले लेख खास माझ्यासाठी बाजूला काढून मला वाचायला देणारं अन त्यावर चर्चा करणार असं माझं कोणी नसेल .…
प्रिय आजी ,
               आज तो दिवस आलाच ; पण त्यामुळेच मला भूतकाळात एक फेरफटका मारायची संधी मिळाली :( 
आई - बाबा सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेल्यावर  गेली जवळपास १७ वर्ष आपणच असायचो सोबत. नेहेमीच. 
जसजशी मी मोठी होत गेले तसं त्याचा स्वरूप बदलत गेलं . अगदी लहान असताना बाबा दादरला सोडायला यायचे तेव्हा तू आंघोळीला गेलेली असलीस आणि आजोबा घरी  असले तरी मी नेहेमीच तू परत येईपर्यंत बाबांना थांबवून ठेवत असे ,  नाही का गं ?
त्या खिडकीखालच्या फळीवर तू भिजत ठेवलेल्या मनुका अन बदाम  खाऊन आपल्या दिवसाची सुरुवात होत असे. मग चाळभर भटकण्यात अन् आजोबांनी दिलेले 'वीस'  प्रश्न सोडवण्यात सकाळ निघून जाई .
दुपारी जेवल्यावर केवळ तुला पडायचं असल्याने मग मला झोपवण्याचा प्रयत्न तू नेहेमीच केलास . दुर्दैवाने यात यश कधीच आले नाही . त्यानंतर मग गोष्टी ,  लेख . बातम्या अन् कविता वाचनाचा कार्यक्रम होई अन् मग उनाडक्या करायला मी मोकळी असे . आई न्यायला आल्यावर पटकन तिच्याबरोबर मी निघाल्ये असे कधी झाले नाही कारण तुला सोडून घरी जायचं ही  कल्पना मला तेव्हादेखील सहन होत नसे.
थोडी मोठी झाले अन् छोट्या शाळेत जाऊ लागले. अगदी दररोज न चुकता वेळेआधीच तू मला न्यायला हजर असायचीस . मग चालत परत येताना रानडे रोडवर धमाल करणं असो किंवा तिथल्या गजरेवाल्याच्या दुकानाबाहेर उभं राहून मांजरी मोजणं असो , उन्हाळा जवळ आला की ताडगोळे सोलून घेणं असो अश्या कित्येक गोष्टी जणू अगदी कालच  घडल्यासारख्या !
पुढे माझी शाळेची वेळ बदलली अन् तुम्ही दोघे ठाण्याला राहायला गेलात . खरंच रोज आठवण यायची तुम्हा दोघांची ; पण मग ती कसर दोन्ही सुट्यांमध्ये भरून काढायचो आम्ही तिघेही तुझी लाडकी नातवंड .
ह्या अनेक सुट्यांमध्ये मी स्वावलंबन शिकले आणि बरेच काही . अगदी अंगण साफ करण्यापासून ते भाडेकरूंच्या पावत्या लिहिण्यापर्यंत सगळी कामे केली . खूपच मजा यायची तेव्हा .
नंतर नंतर आजारपणामुळे तू वरळीला राहायला आलीस आणि मग  गेली आठवर्षे आपण कायमच एकत्रच होतो. तू असल्यामुळे मला कधीच एकटं राहावं लागलं नाही . तुझ्यासोबत पाठ केलेल्या कविता , सुभाषिते , श्लोक , तू घेतलेला इंग्रजीचा अभ्यास आणि बरंच काही .
मी स्पर्धात्मक चेस खेळायचे ह्याचा तुला कोण अभिमान  होता . माझ्याबरोबर दिवसदिवस वेगवेगळ्या स्पर्धांच्य ठिकाणी तू सोबत म्हणून यायचीस . तिथल्या राजकारणाशी तोंड देताना माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन पूर्ण पाठींबा द्यायचीस हे कधीच विसरू शकणार नाही मी . मी इथे बंगलोरला आले तेव्हा मला सगळ्यात जास्त तुझीच काळजी होती कारण …… दिवसभर तुझ्यासोबत कोणीच असणार नव्हत पण तू खंबीरपणे ते एकटेपण स्वीकारलस . शेवटचे तीन महिने खरंच  खूप त्रासदायक होते पण त्यातूनही बाहेर पडण्याच्या तुझ्या दुर्दम्य इच्छाशक्तीला खरंच दाद द्यावी लागेल .

तू हा डाव अर्ध्यावर सोडून गेलीस असा नाही म्हणणार मी पण तो पूर्णही नाही केलास .
आज दोन्ही दादांची शिक्षणं पूर्ण झालीयेत दोघेही कमावते झाल्येत मला माहितेय माझ शिक्षण पूर्ण झालेला तुला बघायच होतं . ते समाधान तुझ्या चेहेऱ्यावर बघणं अन तुझा हात मायेने पाठीवरून फिरणं हे मला पुढचा यश मिळवण्यासाठी नेहेमीच स्फूर्तीदायी होतं अन तू नसलीस तरी यापुढेही असेल . आजही मला आठवतंय,  माझा स्कॉलराशिपचा निकाल लागल्यावर तुला झालेला आनंद पाहून जग जिंकल्यासारखा वाटला होता मला !
तू केलेले संस्कार , तुझी शिकवण अन रोजच्या आयुष्यासाठी लावलेल्या काही चांगल्या सवयी ह्याद्वारे तू नेहेमीच माझ्या सोबत असशील .
यापुढेही जे काही मिळवेन ते तुला नेहेमीच आनद देईल
तू जर असशील जिथे असशील तिथून नेहेमीच मला आशीर्वाद देशील अन प्रेमाचा वर्षाव करत राहशील ह्यात शंकाच नाही .
राहून राहून एकच खंत वाटली म्हणजे मी शेवटच्या क्षणी तुझ्यासोबत नव्हते पण तू पाच दिवसांपूर्वी सांगितलेले शब्द अजूनही मला ऐकू येत आहेत " संपदा ,अभ्यास सोडून केवळ मला भेटायला येऊ नकोस !!"
खरंच आजोबाच्या आणि तुझ्या शिकवणीप्रमाणे हे दु:ख बाजूला सारून अभ्यासाकडे लक्ष देणं अन् खूप शिकणं हीच बहुदा तुला खरी श्रद्धांजली ठरेल .
bye bye
तुझीच लाडकी,
- संप्या
  १९/११/२०१३
  बंगलोर